मुंबई – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. शरजीलच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजकीय नेत्यांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजप या मुद्दावर आक्रमक असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच तक्रार केली आहे.
राज्यातील ठाकरे सरकार एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीविरुद्ध काहीही भूमिका घेत नाही. वक्तव्याला पाच दिवस उलटून गेले तरी काहीही कारवाई झाली नाही, म्हणून आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं असल्याचं खुद्द चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात येऊन कोणीही हिंदुंना काहीही बोलत आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे हिंदूंना वाली नाही. सरकार काही करणार आहे की नाही? असा सवाल पाटील यांनी केला. तसेच राज्यात हिंदूंबद्दल असं बोलणाऱ्यांवर काही कारवाई का नाही? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कोणी काहीही बोलायचं का ? 5 दिवस झाले तरी काही कारवाई झालेले नाही म्हणून मी आज योगी आदित्यनाथांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
दरम्यान शरजीलवर कारवाई झाली पाहिजे. कारवाई करायला उशीर का होतोय? हिंदु समाज सोडून इतर समाजांचा विषय असता तर सामनातून अग्रलेख आला असता. आता महाविकास आघाडी असल्यामुळे राऊतांचा अग्रलेख नाही, अशी बोचरी टीका पाटील यांनी राऊत यांच्यावर केली.