नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर गेल्या सहा दिवसात 11 टक्क्यांनी कोसळला आहे. सोमवारी या शेअरच्या किमती चार टक्क्यांनी कमी झाल्या. या कंपनीच्या शेअरचा भाव सध्या 2,508 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला आहे.
शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदात कंपनीचा नफा 22 टक्क्यांनी वाढून 16,203 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा तेलशद्धीकरण क्षेत्रातील नफा वाढला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या रिलायन्स जिओवरील सबस्क्रायबर वाढत आहेत.
मात्र अशा परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची विक्री केली आहे. शेअर बाजारात एकूणच वातावरण नकारात्मक असल्यामुळे गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
लघु पडल्यात जरी कंपनीच्या शेअरचा भाव कमी झाला असला तरी दीर्घ पल्ल्यामध्ये कंपनीच्या शेअरचा भाव वाढण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील नफा वाढणार आहे. त्याचबरोबर रिलायन्स जिओ भारतातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी म्हणून उदयास येत आहे.