कराड – प्रगतीची वाट शिक्षणाच्या दारातून जाते. त्यामुळे पालकांनी वेळप्रसंगी कष्ट घेऊन मुलांच्या उत्तम शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
खा. श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मारूल हवेली, ता. पाटण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच अक्काताई मस्के, उपसरपंच ड. गणपत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सारंग पाटील म्हणाले, मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जो जितका ज्ञान अर्जित करतो, तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी महत्वाची असते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा पाया प्राथमिक शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेले शिक्षण, संस्कार आणि मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण असते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे. मुलांना शैक्षणिक दिशा देण्यात पालकांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्नशील रहावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे; असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वागत मुख्याध्यापक प्रकाश पानस्कर यांनी केले. नितीन शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शंकर नांगरे, पूनम मोरे, माधवी कांबळे, कोमल पाटील, स्मिता कदम यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.