गाझियाबाद : मोदी सरकारच्या भीतीमुळे विरोधक विखुरलेले आहेत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी शुक्रवारी केला. विरोधकांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
लोकतांत्रिक जनता दलाचे मार्गदर्शक असणारे यादव येथे पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम सध्या तुरूंगात आहेत. तर इतर काही नेते जामिनावर बाहेर आहेत. आपल्याविरोधात गुन्हे दाखल केली जातील अशी धास्ती विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे विरोधी पक्ष एकवटलेले नाहीत. त्याचा राजकीय लाभ सत्ताधारी भाजप उठवत आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांत हातमिळवणी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याबाबत बोलताना यादव म्हणाले, विरोधकांची एकी अनिवार्य असून ती काळाची गरज आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी त्या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रम बनवणे गरजेचे आहे.