मुंबई – एमसीए अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली यासोबतच शरद पवार,देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर आले होते. यावेळी नेत्यांकडून चांगलीच शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली. एमसीएमुळे शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात युती दिसून आली. यावर आता केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आत्ताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे. असं स्पष्ट मत आठवलेंनी व्यक्त केलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं. २०२४ च्या निवडणुकीत शरद पवार हे नरेंद्र मोदींना साथ देतील असही आठवले यावेळी म्हणाले. तसेच पवारांनी या निवडणुकीत ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांसोबत युती केली असल्याचे देखील आठवले यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील एमसीएच्या मैदानात उतरले होते. त्यांनी पवार आणि शेलार यांनी स्थापन केलेल्या पॅनलमधून उमेदवारी दाखल केली होती. पवार आणि शेलार पॅनलने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत डिनर डीब्लोमसी केल्याचे देखील या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाले.