मुंबई : राज्यात अडीच वर्षांपूर्वा मविआच्या निमित्ताने नवे राजकीय समीकरण पहायला मिळाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने तर राज्यात एकच गोंधळ उडून गेला. दरम्यान आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढणारी जवळीक पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच आज हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस आहे. मनसेने शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ४ वाजता एकनाथ शिंदे उद्घाटनासाठी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे त्रिकूट एकत्र दिसणार आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल कौतुक केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं औक्षण केले होते. तसेच गणेशोत्सवात एकनाथ शिंदे ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाली होती. दरम्यान सध्या दीपोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणारं हे त्रिकूट भविष्यात राज्याच्या राजकारणातही एकत्र दिसणार का? हे पहावे लागेल.