मुंबई : ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय लवकरच समोर येणार आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी यावर आपले मत मांडले आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. नागपूर विमातळावर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या निकालासंदर्भात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहेत. यासंदर्भात काय सांगाल?” असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावर पवारांनी, “मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी “त्यांचा (निवडणूक आयोगाचा) निर्णय जो काही असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल,” असेही सांगितले आहे.
मुंबईमधील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्कासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद सुरु आहे. या निवडणूक चिन्हासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याची विनंती एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. मात्र ठाकरे गटाने या मागणीला कडाडून विरोध केला आहे.
दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं सादर केली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी आणि सत्यता तपासून पाहिल्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. फक्त पोटनिवडणुकीसाठी हंगामी आदेश देऊन निवडणूक चिन्ह गोठवण्यात येऊ नये, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. पुरावे सादर करण्यासाठी आज दुपारी दोन वाजेपर्यंतचा अंतिम वेळ दोन्ही गटांना देण्यात आली होती.