मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा, बीड, कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहेत. तसेच वर्षातला मोठा सण असणाऱ्या दिवाळीतच बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हणत याची किंमत त्यांना द्यावी लागणार असल्याचे म्हटले.
शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी राज्यावर आलेल्या अस्मानी संकटावर बोलताना यंदाचे संमिश्र अस वर्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच बाजारपेठे फुलून गेली आहे. राज्यात अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची किंमत त्यांना द्यावी लागणार आहे यात काही प्रश्नच नाही. तसेच जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी पुढेच संबंध वर्ष शेतीसाठी पूरक असतो असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
जो जिरायत भाग म्हणून ओळखला जातो तिथे उसाचे पीक घेतले जात आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असले तरी पावसाचा फायदा वर्षभर होणार आहे. यामुळे लोकांचा फायदा होईल असे म्हणायला हरकत नाही. पावसामुळे पहिल्या पिकांवर परिणाम झाला आहे.पण पावसाचा फायदा दुसऱ्या पिकावर होईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.