मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता राज्यात नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना जाहीर विरोध करण्यात येत आहे. मात्र या सर्व वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले,’कोणत्याही चित्रपटात एखादा कलाकार जर एखादी भूमिका करत असेल तर त्याचाकडे फक्त आणि फक्त कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं.’
ते पुढे म्हणाले,’गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. म्हणून चित्रपटात एकादी भूमिका साकारत असलेल्या व्यक्तीला कलाकार म्हणूनच पाहावे. असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटाचा संदर्भही दिला की,’ छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने जर औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली.