मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काल चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर सभागृहात दिशा सालियनचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळाले. अशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर विरोधकांनी जोरदार निषेध नोंदवला.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फोन करुन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
अजित पवार यांना फोन करुन शरद पवार यांनी सभागृहात नेमकं काय घडलं होतं याची सविस्तर माहिती घेतली आहे. जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं तेव्हा अजित पवारही सभागृहात उपस्थित होते. निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांनी सभात्याग केला होता. आणि याच घटनेचा संपूर्ण आढावा शरद पवार यांनी घेतला आहे. दरम्यान, ‘निर्लज्ज’ असा शब्दप्रयोग केल्याचा ठपका ठेवत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले.
नेमकं विधानसभेत काय घडलं होतं? वाचा….
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली.
सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. नागपुर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.