IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालीकेत 1-0 अशी आघाङी घेतली आहे त्याबरोबरच एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 276 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. ऋतुराजने 71(10 चौकार) धावांची तर शुभमन गिलने 74 (6 चौकार आणि 2 षटकार) धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार केएल राहुलने 58 धावांची(4 चौकार आणि 1 षटकार) नाबाद खेळी खेळली. त्याने 49व्या षटकात शॉन बॉटला षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
भारताने 1996 नंतर म्हणजेच 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. 1996 नंतर आता भारतीय संघाने बाजी मारली आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने मागील चार एकदिवसीय सामने जिंकले होते. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाईल.
तत्पूर्वी,भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारणं केलं होतं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 50 षटकात सर्व गडी गमावून 276 धावांंपर्यतच मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावा केल्या. जोस इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावांचे योगदान दिले. लॅबुशेननेही 39 धावांंची खेळी केली.
भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. शमीनं 10 षटकात 51 धावा दिल्या. बुमराह, अश्विन आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली तर शार्दुल ठाकूरनं 10 षटकात सर्वाधिक 78 धावा दिल्या. त्यालाा एकही विकेट घेता आली नाही.