सातारा – जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला विविध प्रकारची व उत्कृष्ट उत्पादने तयार करत असून त्यांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी हमी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उमेद मेळावा, तसेच बचत गट पुरस्कार, घरकुल व स्वच्छता पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. देसाई बोलत होते.
व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी एन. चंद्रा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह विविध विभागप्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, “”महिलांच्या प्रगतीसाठी शासन विशेष प्रयत्नशील असून नुकतेच शासनाने बचत गटांचे खेळते भांडवल 15 हजार वरून 30 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी – चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील मोठ्या मॉलमध्ये आपल्या जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी महिलांनीही साथ द्यावी. जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेऊन बचत गटांच्या उत्पादनांना वेळापत्रकानुसार विक्रीसाठी पाठवण्याचे नियोजन करावे. निवडक चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करावे. त्यामुळे उत्पादनांचा दर्जा वाढेल आणि शहरांमध्ये चांगली बाजारपेठ निर्माण होईल. घरकुल योजनेत जिल्ह्यात चांगले काम सुरू असल्याबद्दल जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.”
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, “”ग्रामीण भागातील महिलांना समाजामध्ये चांगले स्थान निर्माण करण्याची संधी “उमेद’ ने दिली. महिलांनीही पुढे जाऊन नवनवीन व्यवसाय करावेत. बचतगटांतून उद्योग व्यवसायाचे जाळे निर्माण करुन महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहेत.” बचतगटातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे, असे नरेंद पाटील यांनी सांगितले. उमेद अभियानामध्ये जिल्ह्यात झालेल्या आणि सुरू असलेल्या कामाचा तसेच घरकुल योजना, स्वच्छता अभियान याविषयी ज्ञानेश्वर खिलारी यांनी माहिती दिली.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेच्या 20 लाभार्थीना लाभ वाटप करण्यात आला. महाआवास अभियान ग्रामीण पुरस्कार, अमृत महाआवास अभियान पुरस्कार, महाआवास योजनेत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास बचत गटाच्या महिला, लाभार्थी, पुरस्कारार्थी, नागरिक उपस्थित होते. संतोष हराळे यांनी आभार मानले.