रायरेश्वर पठार रानफुलांनी बहरले; पर्यटनाला बंदी
वीसगाव खोरे (वार्ताहर) – दमदार पावसामुळे रायरेश्वर पठारावर डोंगरउतारांवर छोटी-छोटी रानफुले फुलली असल्याने एक बहारदार शालूच सह्याद्रीच्या कडेपठारांनी परिधान केला आहे, असा भास होत आहे.
काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतचे आयुष्य असणाऱ्या या फुलांचे एक समृद्ध भांडारच सप्टेंबरअखेरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात एकदाच फुलते, कवळा, रानहळद, गोकर्ण, काटेसावर, पिवळा धोत्रा, तेरडा, जांभळी मंजिरी, सोनतारा, घाणेरी, ऑर्किड,दाहण ही रानफुले मन मोहून घेतात.
भोरपासून 25 कि. मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
अशा या रायरेश्वर किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृश्य म्हणजे एकाच नजरेत दिसणारे किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, कमळगड, केंजळगड होय, तसेच देवघर धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र, करोनाच्या संक्रमणामुळे पर्यटनास बंदी असल्यामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे.