शाहूनगर, गोडोली उपनगरे गेली खड्ड्यात, गटारे तुंबल्याने साथीच्या रोगांचा फैलाव
सातारा – आधीच राजकीय संघर्ष टोकाचा आणि विकासकामातही शह-काटशहाच्या राजकारणामुळे शाहूनगर व गोडोली भागातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्डे आणि त्यात तुंबलेल्या गटारांचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने शाहूनगरच्या त्रिशंकू भागाची व्यथा संपलेली नाही.
नगरपालिकेने पाच वर्षापूर्वी 32 कोटी रुपये खर्च करून शहरातील 65 रस्ते तयार केले होते. त्यानंतर गोडोली, शाहूनगर भाग पायाभूत सुविधांसाठी झगडत आहे. मोनार्क चौक ते बागडे वस्ती हा रस्ता विकास आराखड्याप्रमाणे चाळीस फुटांचा आहे. मात्र, काळोखे चौकाच्या पुढे अतिक्रमणांनी निम्मा रस्ता गिळला आहे. गणेश कॉलनी-जिजाऊ उद्यान-समाज मंदिर-मोरे मळा या मुख्य रस्त्यावर प्रचंड खड्डे व वाहणारे गटाराचे पाणी, अशा दुहेरी अडचणीतून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. शहरात असा एकही रस्ता राहिलेला नाही की, ज्या रस्त्यावर खड्डा नाही.
वाहनधारक आणि नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पाऊस पडत असताना खड्ड्यांमध्ये पाणी साचत होते. त्यामुळे किरकोळ अपघात आणि भांडणाचे प्रकार होत होते. नगरसेवक शेखर मोरे यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा केला, तेव्हा 2017 मध्ये एकदाच गोडोलीत काही भागात पॅचिंगसाठी सहा लाख रुपये देण्यात आले होते. बरीचशी विकासकामे राजकीय आकसातून हाणून पाडण्यात आली. आता आमदार व माजी खासदार एकाच पक्षात गेले तरी नगरसेवकांचा राजकीय सवता सुभा कायम आहे.
सुधारित पाणी पुरवठा योजना अमलात आणण्यासाठी जीवन प्राधिकरणाने शहरात मोठमोठे खड्डे खणले होते. ही योजना आता पूर्णत्वास आली असली तरी रस्त्यांची दुरुस्ती न करा या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकल्याने पावसाळ्यात चिखल होत होता. सायन्स कॉलेज रस्ता, काळोखे चौक, मीनाक्षी बंगला, शिवनेरी कॉलनी, जगतापवाडी येथील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.
सायन्स कॉलेज ते शिवाजी महाविद्यालय या रस्त्याच्या वळणावर मोठा खड्डा पडला असून विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. या भागात पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. रहिमतपूर रोडवर मोनार्क चौकात खड्डा पडला आहे. ठेकेदारांना पॅचिंगसाठी तीस लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. त्यात गोडोलीच्या वाट्याला किती निधी आला आहे, याची माहिती आजी-माजी नगरसेवकांना आहे का, हा प्रश्न आहे.