सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष तयारी
पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करून बंदोबस्ताची आखणी : पोलीस उपायुक्तस्तरावर बैठका
पुणे – अयोध्येच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज येणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलीस सतर्क असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करून बंदोबस्ताची योग्य आखणी केली आहे. तसेच, पोलीस उपायुक्तस्तरावर बैठका घेऊन समन्वय साधला जात आहे.
निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. सोमवारपासून पोलीस उपायुक्तस्तरावर सर्व धर्मातील प्रतिष्ठित व्यक्ती, धर्मगुरू यांच्याशी चर्चा केली जात आहे. सर्वांसोबत संवाद साधला जात आहे. समाजकंटक व्यक्तींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. ज्या सराईतांवर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. गरज पडल्यास अशा समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस सतर्क आहेत.
नागरिकांनी सोशल मीडियावर आफवा पसरविणारे संदेश पुढे पाठवू नये. सोशल मीडियावर असे संदेश पाठविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर टाकू नये. तसेच, धार्मिक भावना दुखावतील, असा जल्लोष व फटाके वाजवू नये.
मिरवणुका काढू नये. तसेच, त्या संदर्भात अभिनंदन करणारे व निषेध करणारे फलक लावू नये, जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व अक्षेपाहार्य व्हिडीओ, फोटो पुन्हा प्रसारित करून आफवा पसरू नये. कोणी अक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडीओ टाकल्यास ते डिलीट करावेत, असे संदेश प्रसारित करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शिसवे यांनी सांगितले.
संदेश पाठविणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष
नागरिकांनी सोशल मीडियावरून निकाला संदर्भात टीका-टिप्पणी करू नये, तसेच आफवा परसविणाऱ्या संदेश पाठविणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे, अशी माहिती माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
“नागरिकांनी सोशल मीडियासंदर्भात दक्ष रहावे’
राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवून शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. तसेच, नागरिकांनी सोशल मीडियासंदर्भात दक्ष रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पिंपरी-चिंचवडचे सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.