मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि नाव हे शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यातच सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चालल्याची टीका केली. याच टीकेला आता उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
अमित शाहांच्या टीकेला उत्तर देताना,” मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये शाह यांना उत्तर दिले. तसेच आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
या आरोप प्रत्यारोपांवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘राजकारणात अशी टोपण नावं पडतातच. अशी नाव राजकारण्यांनी स्वीकारली पाहिजे, असं माझं वयक्तिक मत आहे. तरच राजकारणातला खेळतेपणा राहतो. नाहीतर याने मला मोगॅम्बो म्हटलं म्हणून त्याला गोळ्या घालायच्या असं व्हायला नको.’ असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.