द्वेषाची भिंत पाडून प्रेमाच्या पुलाची निर्मिती करण्याची गरज- डॉ. राम पुनियानी
नगर – समाजातील द्वेषाची भिंत पाडून प्रेमाच्या पुलाची निर्मिती करण्याची गरज आहे. या देशाला भक्तीसंत व सुफी संतांची परंपरा आहे. ती पुढे नेण्याचे कार्य या नगर येथील शाहीन बागेतून होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते डॉ. राम पुनियानी यांनी केले. संविधान बचाव समिती, नगर आयोजित तीन दिवसीय शाहीन बाग आंदोलनच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ.राम पुनियानी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ.पुनियानी म्हणाले, सध्या देशात बाबर, औरंगजेब हे हिंदू द्वेष्टे होते. परकिय आक्रमणकारी होते. असा प्रचार करुन काही लोक हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत. त्या करीता देशासमोर खरा इतिहास आला पाहिजे. बाबरला भारतात राणासंगाने बोलविले व बाबर व राणा संगा यांनी इब्राहिम लोदीच्या विरुद्ध युद्ध करुन संपत्ती व सत्ता भागीदारीत मिळविली, हा खरा इतिहास आहे.
औरंगजेब यांच्या नावाने असलेला दिल्ली येथील मार्गाचे नाव बदलण्याचा प्रयत्न होत आहे. औरंगजेब हे हिंदूंचा द्वेष करायचे, मंदिरे पाडायचे असा अपप्रचार केला जातो. औरंगजेबाने उज्जैनच्या महाकाल मंदिर, गुहाटीचे कामाक्षी मंदिर व वृंदावन येथील श्रीकृष्ण मंदिरांना मोठे इनाम दिले आहेत तर टिपू सुलतानने आपली प्रजा हिंदू आहे म्हणून मंदिराची रखराखव व डागडूजी केली हा खरा इतिहास आहे.
अकराव्या शताब्दीत राजा हर्षदेव या हिंदू राजाने मूर्तीच्या भजनाकरिता एका विशेष पदाची निर्मिती केली व त्याला आदेश दिले की, सोने-चांदी, हिरे, जवाहिरे असलेल्या मूर्तींचे भंजन करायचे व ते राजाकडे सादर करायचे. प्रजेच्या पूजेअर्चेसाठी दगडी मूर्ती ठेवायच्या असा आदेश केला होता. संपत्ती साठविण्याची केंद्र त्या काळात मंदिरे होती. त्यातून सोमनाथ मंदिरावर गझनीच्या मंहमदानी स्वारी केली. त्याला आणणारे हिंदू होते.
शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला हे युद्ध हिंदू मुस्लिम होते का? तर याचे उत्तर आहे नाही. शिवाजी महाराजांच्या अठरा अंगरक्षकांपैकी 12 अंगरक्षक मुसलमान, आरमारासह प्रमुख पदावर मुसलमान, अफझल खानाच्या भेटीसाठी जाताना राजांना वाघनखे देणारा रुस्तुमे जमाल तोही मुसलमान, असे पुनियानी यांनी सांगितले.