नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षास्थितीचा आढावा घेतला. बैठकीतील चर्चेचा भर प्रामुख्याने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवर राहिला. जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे नापाक सत्र अवलंबले आहे.
दहशतवादी प्रामुख्याने काश्मिरी पंडित आणि परप्रांतीय कामगारांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे अस्वस्थ आणि संतप्त बनलेल्या काश्मिरी पंडितांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या स्थितीवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, शहांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.
त्या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज पांडे, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहिले. बैठकीत झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही.