सिमला – हिमाचलप्रदेशातील अतिवृष्टीमुळे तेथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या राज्यात पंधरा रशियन पर्यटक अडकले आहेत. हे पर्यटक कसोल मधे असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला रशियन दूतावासाकडून हीं माहिती मिळाली. त्यांनी कासोलमध्ये 15 रशियन पर्यटक अडकले आहेत असे कळवले आहे. आम्ही संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकदा आम्हाला पर्यटकांशी संपर्क साधता आला की आम्ही त्यांच्या स्थितीबद्दल दूतावासाला कळवू, असे कार्यवाहक डीजीपी सतवंत अटवाल त्रिवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र टीम तैनात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सतत काम करत आहोत.
आम्ही चार लाइन तयार केल्या आहेत आणि देशभरातील लोकांशी संपर्क साधून त्यांच्या कुटुंबियांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. सकाळपासून 200 लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. आम्ही दूतावासांशी देखील संपर्क साधत आहोत, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने या डोंगराळ राज्यात गेल्या 48 तासांत 20 जणांचा बळी घेतला आहे.
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असून भूस्खलन, वीज खंडित होणे, रस्ते ठप्प होणे आणि पुलांचे नुकसान होणे असे प्रकार घडले आहेत. 3,000 कोटी ते 4,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी मंगळवारी मंडी येथील मदत शिबिरांचा आढावा घेतला. या स्थितीत केंद्राने आम्हाला तातडीने मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री सुखू यांनीही आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि बचाव व मदत कार्याचा आढावा घेतला. दरम्यान आज हिमाचलातील स्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.