शिमला -हिमाचल प्रदेशातील ३ अपक्ष आमदारांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यामुळे त्या राज्यातील कॉंग्रेस सरकारवरील अस्थिरतेचे सावट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.
हिमाचलमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी मागील महिन्यात निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. तर, भाजप उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला.
ती उलथापालथ कॉंग्रेसमधील बंडखोरी आणि अपक्ष आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाली. कॉंग्रेसच्या ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
त्यामुळे रिक्त झालेल्या ६ विधानसभा जागांसाठी १ जूनला पोटनिवडणूक होणार आहे. अशात अपक्षांनीही पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याच्या उद्देशातून राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. हिमाचलात विधानसभेच्या एकूण ६८ जागा आहेत.
६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने कॉंग्रेसचे संख्याबळ ४० वरून ३४ झाले आहे. त्या राज्यात भाजपचे २५ आमदार आहेत. अपक्षांच्या जागांवरही पोटनिवडणूक झाल्यास हिमाचलमधील राजकारणाला रंगतदार वळण मिळू शकते.