मुंबई – महाराष्ट्राने राज्यातील सुक्ष्म स्तरीय नियोजनाद्वारे वीज टंचाई दूर करीत आणली आहे असे राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, कोळशाची सध्या तीव्र टंचाई आहे, देशातील बारा राज्यांत ही टंचाई अधिक असल्याने तेथे वीजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
पण महाराष्ट्राने सुक्ष्म नियोजन करून वीज टंचाई कमी करीत आणली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात लोडशेडिंग झालेले नाही आणि वीजेची तूटही पंधरा टक्क्यांवर आणण्यात आली आहे अशी माहितीही नितीन राऊत यांनी दिली. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, राज्य-संचालित महाजेनकोने 8000 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर किनारपट्टीवरील औष्णिक ऊर्जा प्रकल्प आयातित कोळशावर चालतात, ज्याच्या आयातीवरील बंदी केंद्राने अलीकडेच उठवली आहे.त्यामुळे तेथूनही जादा व सुरळीत वीज उत्पादन होऊ शकेल.
राज्य सरकारने एक लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. कोळशाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेचे रेक उपलब्ध होत नाहींत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की आम्हाला दररोज 37 रेक लागतात, पण आम्हाला फक्त 26 मिळतात. प्रत्येक रेक 4,000 मेट्रिक टन कोळसा वाहतूक करू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.