पुणे, – जादा परताव्याच्या आमिषाने एका व्यावसायिक महिलेसह १३ जणांची तब्बल साडेसतरा कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदीपकुमार भगवानदास गुप्ता (रा. भिवंडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेचा वेंडर पेमेंट सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे. त्यांनी २०२२ मध्ये काही काळ व्यवसाय थांबवला होता. दरम्यान, त्यांची आरोपी संदीपकुमारबरोबर ओळख झाली. त्याने स्वत:च्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना ६ ते ८ टक्के व्याजाचे आमिष दाखवले.
त्याच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी इतर ओळखीच्या व्यक्तींकडून पैसे घेऊन त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. एक दोन वेळा गुंतवणूक केल्यावर तो नेहमी अर्ध्या रकमेवरच परतावा देत होता. उर्वरीत रकमेवर आणखी पैसे टाकून गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. दरम्यान, गुंतवणुकीबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन फिर्यादीने गुंतवलेले पैसे परत मागितले. मात्र, आरोपीने ते देण्यास नकार दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली.