सोरतापवाडी -उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. 29 जून) संध्याकाळी तुफान पाऊस झाल्यामुळे दत्तवाडी येथील गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करणारे कारखाने पाण्याखाली गेल्याने 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर उरुळी कांचन ते अष्टापूर फाटा राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने 12 गावांचा व 12 वाड्यांचा संपर्क तुटला होता. तर 10 तास वाहतूक बंद होती.
उरुळी कांचन ते अष्टापूर फाटा राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने भवरापूर, अष्टापूर, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, डोंगरगाव, बुर्केगाव, पेरणे, हिंगणगाव, मिरवडी, दहीटणे, मेमाणवाडी, शिंदेवाडी, जगतापवाडी, नाव्ही सांडस अशा अनेक गावांचा संपर्क तुटला होता तर अनेक घरांत पाणी शिरले होते.
सरकारी जागेवर अतिक्रमण अनेक ठिकाणी झाले असून चारीमध्ये सात फुटाच्या नळीऐवजी 2 फुटाची नळी वापरल्याने उरुळी कांचन ते पेरणे व पुढे नगर महामार्गला जोडला जाणारा रस्ता बंद झाला. गणपती कारखान्यात तीन ते चार फूट पाणी साचल्यामुळे तयार झालेल्या श्रींच्या मूर्तींचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच करोनाच्या संकटामुळे या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. या नव्या संकटामुळे गणेशमूर्ती व्यावसायिक धास्तावले आहेत.
ओढे, नाले बुजवल्याचे परिणाम
पूर्व हवेलीत जमिनीनां सोन्याचा बाजार असल्यामुळे अनेक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी ओढे, नाले बुजवले जात असून त्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे, या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.