पुणे – पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या दुखद घटना घडतात. अनेकदा या घटना डोंगरभागालगतच्या वसाहतींमध्ये घडतात. दुर्घटना टाळण्यासाठी दरडींचे योग्य व्यवस्थापन करण्यासह सर्वप्रथम अतिपाऊस असलेल्या भागांतील डोंगरउतारावर पाण्याचा अंदाज वर्तवणारे “सेन्सर्स’ बसवणे सर्वांत महत्त्वाचे आहे. “डिजिटल इंडिया’अंतर्गत युद्धपातळीवर हे काम झाले पाहिजे, असा सल्ला दरड व्यवस्थापन तज्ज्ञ राम चंदनकर यांनी “प्रभात’शी बोलताना दिला. दरम्यान, सिक्कीम-दार्जिलिंगच्या डोंगराळ भागात सन 2018 मध्ये अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
राज्यात यंदा एकट्या जुलैमध्येच दरड कोसळण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहे. दरड कोसळल्याने संपूर्ण तळीये गाव दरडीखाली दबले गेले. तसेच नुकतेच मुंबईतील चेंबूर भागात काही दिवसांपूर्वी दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
2014 मध्ये दरड कोसळल्याने माळीण गावच गाडले गेल्याची दुर्दैवी घटना अजूनही पुणेकर विसरलेले नाही. त्यामुळे दरड कोसळणे आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नेमके प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याबाबत पुण्यातील दरड व्यवस्थापन या विषयातील तज्ज्ञ राम चंदनकर यांनी “प्रभात’शी संवाद साधला. चंदनकर म्हणाले, “रस्ते बांधणी, विविध प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी डोंगर फोडले जातात. मात्र, ते करताना त्याचा आसपासच्या डोंगर, नद्या, जमिनीवर काय परिणाम होईल, याबाबत फारसा विचार केला जात नाही. त्याचबरोबर डोंगर उतार-पायाथ्यालगत शेती करताना विशेषत: भातशेती करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे मातीचा वरच्या थराची झीज झाल्याने दरड कोसळण्यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळेच विकासकामे करताना, आसपासच्या पर्यवरणाचा विचार करणे महत्वाचे ठरते.’
पावसाच्या अतिरिक्त प्रमाणाबाबत संकेत देणारे “सेन्सर्स’आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाले आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये असे “सेन्सर्स’ लावल्यास पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या दबावाचे संकेत वेळीच मिळतील. यामुळे प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासाठी ही सूचना महत्त्वपूर्ण ठरेल, असेही चंदनकर यांनी सांगितले.
पूर्वी केवळ थंड प्रदेशाच्या भागात होणारी ढगफुटी आता हवामान बदलामुळे अन्यत्रदेखील होत असल्याचे आढळत आहे. यापुढील काळातही राज्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस जास्त पडणार, हे गृहित धरूनच प्रशासनाने उपाय करावेत. – राम चंदनकर, दरड व्यवस्थापन तज्ज्ञ