नाशिक- नाशिकच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी रोप वे तयार केला जाणार आहे. 5.7 किलोमीटर रोप वे ची लांबी असणार आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून रोप वे चे काम होणार असून साधारणपणे पावणेचारशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित ठेवण्यात आला आहे. मात्र या रोप वेला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे.
एकीकडे अंजनेरी पर्वतावर दुर्मिळ वनस्पती आहेत. गिधाडांचे संरक्षित क्षेत्र आहे. परिसरात जंगल आहे. त्याला धोका पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ब्रह्मगिरी पर्वत परिसरात होणाऱ्या उत्खननाचा मुद्दालाही पर्यावरणप्रेमिंचा विरोध आहे. मात्र पर्यावरण प्रेमींचा सर्व विरोध झुगारून रोपवेच्या कामाला गती दिली जात असल्याने पर्यावरण प्रेमी आक्रमक आहेत तर दुसरीकडे, हा इकोफ्रेंडली प्रोजेक्ट असल्याने पर्यावरणाला कोणतीच बाधा पोचणार नाही, दावा खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे.
याआधी अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी रस्ता बनविण्याचा घाट घालण्यात आला होता. आता रोप वे साठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी परिसरात मुख्य स्टेशन बनविले जाणार असून तिथुनच अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी एक मार्ग आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी दुसरा रोपवे असणार आहे.
31 जुलैपर्यंत मागविल्या निविदा
बहुचर्चित असलेल्या रोप वे साठी एनएचएलएमएलने कंपनीने 31 जुलैपर्यंत मागविल्या असून आता लवकरच रोपवे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनास चालना मिळावी, यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. त्यानुसार आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.