मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्रात एकेकाळी करोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. परंतु काही दिवसांपासून यात सातत्याने मोठी घट होत आहे. राज्यात सध्या दररोज नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
केवळ ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी पाहिल्यास 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत 1 लाख 10 हजार 592 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर या दरम्यान, 1 लाख 23 हजार 694 रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली. करोनातून रुग्ण बरे होण्याचा दरही आता 81.13 टक्क्यांवर पोहोचला आहे.
गुरूवारी महाराष्ट्रात 13 हजार 395 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर 15 हजार 575 जणांनी करोनावर मात केली. काही दिवसांपूर्वी करोनाचे केंद्र बनलेल्या मुंबईत आता रुग्ण वेगाने बरे होत आहे. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दरही 83 टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातील अनेक भागांपेक्षा मुंबईत लोकसंख्या अधिक आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण असतानाही सातत्याने रुग्णसंख्येत घट होत आहे. दरम्यान, वेळेत रुग्णांची ओळख पटवण्यासाठी मुंबईसह राज्यांमध्ये करोनाच्या चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 14 लाख 93 हजार 884 लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी 12 लाख 12 हजार 016 लोकांनी म्हणजेच 81.13 टक्के लोकांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत 2 लाख 22 हजार 761 रुग्णांपैकी 1 लाख 86 हजार 675 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.