अनेकवेळा ज्येष्ठ नागरिकांना समाजात रूढ असलेल्या काही गैरसमजुतींमुळे पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहार मिळत नाही. यापैकी अनेक गैरसमज खोटे व धोकादायक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो. माणसाचे आयुष्य ही सर्वात मोठी यशोगाथा आहे. पण, त्याचवेळी विद्यमान स्थितीमध्ये आयुष्य जगणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.
ऍन ऍप्पल अ डे किप्स द डॉक्टर अवे हे वाक्य आपण अनेक जणांकडून ऐकलेले आहे. पुरेशा प्रमाणात पालेभाज्या खा, भरपूर पाणी प्या, हे देखील आपल्याला अनेकवेळा सांगण्यात आले आहे. या सवयी चांगल्या पौष्टिक आहार मिळण्याची खात्री देतात. पण, या सवयी वृद्ध काळापेक्षा बालवयात, तरुणपणी उपयुक्त ठरतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आहाराच्या बाबतीत काहीशा वेगळ्या पद्धती आहेत.
वरिष्ठ नागरिकांना पौष्टिक आहारासोबतच पुरेशा प्रमाणात कॅल्शियम व जीवनसत्त्वांनी संपन्न असलेल्या आहाराची देखील आवश्यकता असते. अनेकवेळा ज्येष्ठ नागरिकांना समाजात रूढ असलेल्या काही गैरसमजुतींमुळे पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहार मिळत नाही. यापैकी अनेक गैरसमज खोटे व धोकादायक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो.
कमी होणाऱ्या भुकेकडे दुर्लक्ष नको
वाढत्या वयासोबत भुकेमध्ये बदल होतो. चयापचयाची क्रिया मंदावते आणि आवश्यक असलेल्या कॅलरीचे प्रमाण देखील कमी होते. तरुणांच्या तुलनेत ऊर्जा उत्सर्जनाची क्रिया देखील कमी होते. पण, भूक मोठया प्रमाणात कमी होणे हे चांगले लक्षण नाही. यामुळे दात ठिसूळ बनणे, गिळताना त्रास होणे, थायरॉईड संबंधित आजार किंवा इतर आरोग्यविषयक आजार होण्याची शक्यता निर्माण होते. दररोज वजन मोजल्याने योग्य वजन राखण्यात आणि कमी होत असलेले वजन नियंत्रणात आणण्यात मदत होते.
योग्य प्रमाणात पौष्टिक घटक आवश्यक
वृद्धांना कमी कॅलरीची आवश्यकता असते आणि तरुणांपेक्षा त्यांचा आहार कमी असतो. असे असले तरी त्यांना योग्य प्रमाणात पौष्टिक घटक मिळणे आवश्यक आहे. वाढत्या वयासोबत शारीरिक हालचाली कमी होतात आणि शरीराची पौष्टिक घटक शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. म्हणूनच वृद्धांनी अधिक पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. वृद्धांनी त्यांना डॉक्टरांनी सांगितलेल्या नैसर्गिक रिसोर्सेस किंवा पूरक आहारामधून जीवनसत्त्वे ड व ब अशा जीवनसत्त्वांचे सेवन केले पाहिजे.
काही लोक बारीक दिसतात, पण ते जास्त प्रमाणात खातात, बर्गर्स, मिठाई व इतर मेदयुक्त पदार्थाचा भरपूर आस्वाद घेतात आणि ते स्वत:ला आरोग्यदायी समजतात. पण खरे तथ्य असे आहे की, त्यांनासुद्धा हृदयविषयक आजार, अयोग्य प्रमाणात साखर सेवनामुळे होणारा मधुमेह, कोलेस्ट्रॉलची समस्या, अल्झायमर असे आजार होण्याचा धोका असतो. पण, सडपातळ असलेल्या वृद्धांनी आरोग्यदायी जीवनासाठी संतुलित आहार व आरोग्ययदायी खाण्याच्या सवयींचा अवलंब केला पाहिजे.
वृद्ध व्यक्तींनी आहार टाळू नये
एकदा आहार टाळल्याने आपण पुढील आहाराच्या वेळी जास्त खातो. रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे चक्कर येते. जरी तुम्हाला भूक लागली नसली, तरी थोडया प्रमाणात खाणे उपयोगी ठरते. मुख्यत: वृद्धांनी असे केलेच पाहिजे. जे ते वेळा थोडया-थोडया अंतराने खातात, त्यांना चेस्ट इंजेशन्से, श्वसनविषयक आजार होण्याचा धोका कमी असतो आणि इन्सुलिन पातळी देखील योग्य प्रमाणात राखली जाते. आहार टाळल्याने अवेळी खाण्याची सवय लागते. ही सवय आरोग्यास हानिकारक आहे.
रेडिमेड फूड तुमच्यासाठी नाही
एकटे असलेल्या वृद्धांना जेवण बनवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे करताना त्यांना अधिक थकवा देखील जाणवतो. ज्यामुळे ते पॅक्ड फूडचा किंवा रेडिमेड फूडचा आधार घेतात. अशा प्रकारांच्या अन्नांमध्ये मीठ, प्रीझर्व्हेटीव्हज, साखर इत्यादींचे प्रमाण अधिक असते. हा आरोग्यदायी पर्याय नसून आरोग्याला अत्यंत धोकादायक आहे.
कृत्रिम सप्लीमेण्ट्सची गरज नसते
लोकांमध्ये हा मोठा गैरसमज आहे की, जसे आपण वृद्ध होऊ लागतो, तसे आपण मल्टीव्हिटॅमिन व कॅल्शियम सप्लीमेण्ट्स घेतले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार व कुपोषण यासारखे आजार होऊ शकतात. पोषणासाठी कृत्रिम सप्लीमेण्ट्सवर अतिप्रमाणात अवलंबून राहणे चांगले नाही. डॉक्टरांच्या सल्यानुसारच त्यांचे सेवन करावे, सोबत संतुलित आहारही घ्यावा.
बद्धकोष्ठता व ब्लोटिंग असली तरी आहार टाळू नये
हा अत्यंत धोकादायक गैरसमज आहे. आपल्या शौचालयाच्या सवयीसंदर्भात अन्नाच्या दर्जासोबतच त्याचे प्रमाणदेखील महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठता किंवा ब्लोटिंगचा त्रास असेल, तर त्याने अधिक प्रमाणात औषधे घेण्यापेक्षा किंवा आहाराचे प्रमाण कमी करण्यापेक्षा फायबर्सयुक्त आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आहाराकडे लक्ष ठेवल्यास आरोग्य उत्तम राहण्यामध्ये मदत होते. भूक कमी झाली असेल किंवा वजन कमी झाले असेल किंवा वजन वाढले असेल, तर डॉक्टरांच्या सल्यानुसार वेळेवर योग्य उपचार करणे उत्तम ठरेल. असे म्हटले जाते की उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम.
डॉ. मेधा क्षीरसागर