फलटण तालुक्यातील स्थिती; महावितरणच्या कारभाराने पिकांना पाणी नाही
काशीळ – “महावितरण’च्या अतीत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत विजेचा लंपडाव सुरू असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून ग्रामस्थ तसेच शेतकरीवर्गाला चटके बसू लागले आहेत. उपकेंद्रात दर्जाहीन साहित्यांचा वापर केला जात असल्यामुळे सातत्याने वीज खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रात्रभर जागून शेतकरी पिके जगवण्यासाठी धडपड करतात, याचे वीज वितरण कंपन्यांना काहीच सोयरसुतक दिसत नाही. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अनेक गावांना रात्री अंधारात काढाव्या लागल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती असतानाही या प्रकाराकडे वरिष्ठांकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
काशीळ, अतीत परिसरातील गावांच्या परिसरात सातत्याने विजेच्या लपंडावामुळे व्यावसायिकांचेही व्यवसाय धोक्यात आले आहेत. तांत्रिक कारणामुळे गायब होणाऱ्या विजेची भरपाई केली जात नसल्यामुळे शेतातील पाण्याची पाळी पूर्ण होत नसल्यामुळे पाणी असतानाही पिकांना पाणी देता येत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे वीज जाते. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना स्वतःचा जीव धोक्यात घालून कामे करावी लागतात.
या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या फ्यूज बॉक्सची दुरवस्था झाली आहे. फ्यूजच्या जागी अनेकवेळा नुसत्या तारांचा वापर केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांच्याही जीवला धोका पोचू शकतो. इतकी धोकादायक परिस्थिती असतानाही वरिष्ठांना मात्र काही देण-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.