चार महिन्यांपासून दुरुस्ती नाही : मारावे लागत आहेत हेलपाटे
पिंपरी – राज्य परिवहन महामंडऴाच्या (एस.टी) वतीने ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या “स्मार्ट कार्ड’मध्ये चुकांचे प्रमाण वाढले आहे. आधी स्मार्टकार्ड नोंदणीसाठी हेलपाटे मारुन झाल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना “एसटी’ने केलेल्या चुकांमुळे हेलपाटे मारावे लागत आहेत.
स्मार्टकार्ड नोंदणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना किमान 15 दिवसात संबधित आगारात स्मार्टकार्ड देण्यात येते. मात्र, आलेल्या कार्डवर फोटो आणि नावात विसंगती होत असल्याने अशी स्मार्टकार्ड परत राज्य परिवहनच्या मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, चार महिने उलटून गेले तरी सुद्धा सुधारणा होऊन स्मार्टकार्ड आगारात पोहचले नसल्याचे वल्लभनगर आगारात नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे.
65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरात चार हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास सवलतीच्या दराने करता येऊ शकतो. यासाठी स्मार्टकार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी झपाट्याने नोंदणी केली जात आहे. मात्र, नोंदणी केलेल्या स्मार्टकार्डवर चुका होत असल्याने नोंदणीला काहीसा ब्रेक लागत असून दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांना दुप्पट काम करावे लागत आहे. तर, यासाठी ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वल्लभनगर आगारात स्मार्टकार्डमध्ये चुका वाढल्या आहेत. नाव, क्रमांक अथवा माहितीच कार्डवर अदलाबदल होत असल्याने ते कार्ड पुन्हा मुंबई कार्यालयात पाठवावे लागत आहे. परिणामी, ज्येष्ठांना ते कार्ड घेण्यासाठी आगारात हेलपाटे मारावे लागत आहेत.
शहरात 9 हजार ज्येष्ठांनी केली नोंदणी
एसटी महामंडळाच्या वतीने 1 एप्रिलपर्यंत स्मार्ट काढ काढण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. वल्लभनगर आगारात 31 डिसेंबरपर्यंत 7 हजार 974 जणांनी नोंदणी केली होती. त्यानंतर अवघ्या चाळीस दिवसांत म्हणजेच 10 फेब्रुवारीपर्यंत ती नोंदणी 9 हजारापर्यंत गेली आहे. दिवसाला साधरण 30 ते 40 नोंदणी होते. म्हणजेच जवळपास 1 हजाराने त्याची वाढ झाली आहे. तर, विविध खासगी एजन्सीमार्फत 6 हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झाली आहे. तर, आत्तापर्यंत 5 हजार 244 जणांना कार्डचे वाटप करण्यात आले असून 3 हजार कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. चुकांची दुरुस्ती करुन लवकर बधित आगारात पाठवण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.