पिंपरी, दि. 31 – काही दिवसांपूर्वी काळेवाडी चिंचवड पुलावरून जाणारे नागरिक कचऱ्याचा वास येत असल्याने नाक दाबून जात होते. आता मात्र त्या ठिकाणी रेन्बो आणि मशरूम थीम तयार केली आहे. यामुळे नागरिक थांबून सेल्फी घेत आहेत.
पिंपरी चिचंवड महापालिका घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहे. यामुळे शहराच्या विविध भागात असलेल्या कचरा कुंड्या ठेवणे बंद केले आहे. कचरा कुंडी विरहित शहराकडे आपली वाटचाल सुरू आहे. चिंचवड काळेवाडी यांना जोडणारा पवना नदीवर पूल आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर नागरिक जाता-येता कचरा टाकत होते. त्यामुळे महापालिकेने याठिकाणी “कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल’ असा फलक लावला. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या आरोग्य पथकाने कचरा टाकणाऱ्या काही नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली. मात्र सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा नागरिक कचरा टाकून जात होते.
या ठिकाणाहून जवळ काळेवाडी येथे एमएम खासगी शाळा आहे तर केशवनगर, चिंचवड येथे महापालिकेची शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक या पुलावरून ये-जा करीत असतात. या पुलाच्या दोन्ही बाजूला कचऱ्या ढीग असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. तसेच कचरा कुंडीवर अन्नाच्या शोधात भटकी कुत्रीही मोठ्या प्रमाणात येत होती. यामुळे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना कधी-कधी या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत होता.
येथील कचऱ्याचे ठिकाण बंद करण्यासाठी हा परिसर विकसित करण्याचा निर्णय महापालिकेच्या ब प्रभागाने घेतला. स्थापथ्य विभागातील कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता किरण अंदुरे यांच्या संकल्पेतून कनिष्ठ अभियंता संजय लोखंडे यांनी कचरा टाकण्याच्या ठिकाणी मशरूम आणि रेम्बो थीम विकसित केली. यासाठी अवघा 40 हजार रुपयांचा खर्च आला आहे. एकेकाळी ज्या ठिकाणाहून नागरिका नाकावर रुमाल ठेवून जात होते. आता त्याच ठिकाणाहून जाणारे पादचारी व वाहन चालक वाहने थांबवून सेल्फी घेत आहेत.