हडपसर(विवेकानंद काटमोरे,प्रतिनिधी) – खासगी ट्रॅव्हल्स बसने हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकुन अपघातही झाले आहेत.
रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या राहत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर सोसायटी धारकांना घरी ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचारी येथे असतानाही तासन् तास या खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करून उभ्या असतात. याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आमदार चेतन तुपे यांनी याच विषयाकडे थेट विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधले.
हडपसर येथील पुणे- सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. याशिवाय वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातास निमंत्रण मिळत आहे. खासगी ट्रॅव्हल बसेसला दुसरीकडे थांबे देण्यात यावेत, या बसेसवर नियमित कारवाई करण्यात यावी, हे अनाधिकृत थांबे वर्दळीच्या हद्दीबाहेर हलवावे, वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घेऊन तेथूनच या ट्रॅव्हल बसेस सोडण्यात याव्यात ,असा अनेक उपाययोजना वर पोलीस अधिकारी ,लोकप्रतिनिधी ,पत्रकार व तज्ज्ञांच्या उपस्थितीत वारंवार चर्चा व बैठका घेतल्या गेल्या. मात्र, या बैठकांनतर अवघ्या आठवड्यात पुन्हा या खासगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर येवून थांबतच आहेत. त्यामुळे वाहन चालक, सोसायटी धारक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
आमदार चेतन तुपे यांनी खाजगी बसच्या मनमानी थांब्याकडे विधानसभेत वेधले लक्ष
विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्तावात हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी राज्यातील तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. अवजड वाहनांना दिवसभर वाहतूक बंदी केली परंतु थोड्याच दिवसात या नियमाचा विसर पडला आणि पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. या अवजड वाहनांना दिवसा वाहतूक करण्यास पुन्हा बंदी घातली जावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या बसेस ही हडपसर ला भेडसावणारी मोठी समस्या आहे , हे सांगत त्यांनी १५ नंबर, रवीदर्शन ते गाडीतळ, मगरपट्टा कॉर्नर येथे बसेस रस्त्यावर उभ्या राहतात. वाहतूक पोलिस याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत, असे परखडपणे सांगितले. पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे व चिरीमिरी गोळा करत आहेत. यातून फक्त खाजगी वाहतूक कंपन्यांचे हित जपले जाते आहे. पण यात सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. असे निदर्शनास आणून दिले.