सातारा -जिल्ह्यात कडधान्य व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सर्व पिकांना हमीभाव दिला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याआधी हमीभाव शेतकऱ्यांना मिळतो का ते बघावे व नसेल तर याबाबत कारवाई करावी अन्यथा न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला.
याबाबत दिलेल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कडधान्ये व्यापाऱ्यांकडून हमीभाव, काटामारी यातून प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणा मुळे पिके अनेक रोगराईला बळी पडली. आता काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने काही पिके हातची जात आहेत. या सगळ्याच्या तावडीतून जे वाचते, त्यालाही कडधान्य व्यापारी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून लुटतानाचा दरवर्षी अनुभव आहे. परंतु, पुराव्यानिशी तक्रार करूनसुद्धा न्याय मिळत नाही. यातील मुख्य पिक सोयाबीन असून तीन ते चार महिन्यांत येणारे नगदी पीक आहे.
अनेक वर्षे जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू नाही व केले तर वेळ निघून गेल्यावर केले. व्यापारी हमीभाव देत नाहीत, दुसऱ्या बाजूने अवास्तव हवा धरुन हवा, माती, कचरा, सेस, बारदान, हमाली अशी सर्व प्रकारे अनेक किलोची लूट करतात. वजनकाटा यंत्राद्वारे लुटतात, असे अनेक अनुभव याआधी आले आहेत.
बिलाच्या पक्या पावत्या देत नाहीत व शासनाचाही कर बुडवतात. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यात किती क्षेत्रात पेरणी झाली व संभाव्य उत्पादनाची माहिती घेण्यात यावी व महसूल विभागाकडून गाववार पिकपाणीची माहिती घेऊन बाजार समितीच्या सेस पासल्यास ही लूट उघडकीस येईल. उत्पादनाच्या 25 टक्केही कर वसूल केला जात नाही, मात्र शेतकऱ्यांकडून तो घेतला जातो, असे या निवेदनात म्हटले आहे.