- कामगार संघटनांच्या हालचालींवरही ठेवले जाणार लक्ष
पिंपरी – औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला आहे. मात्र यासाठी आपल्याला उद्योजकांचीही साथ लागणार आहे. भंगार माफिया किंवा कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर महाराष्ट्र महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहर ही उद्योगनगरी आणि कामगार नगरी म्हणून ओळखली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून उद्योगधंदे करण्यासाठी नागरीक व उद्योजक शहरात येत आहेत. पिंपरी चिंचवडनंतर चाकण, तळेगाव, हिंजवडी भागात मोठ्या प्रमाणात उद्योग वाढत आहेत. मात्र काहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. कंपनीसाठी लागणारे कामगार आमच्याकडून घ्या, हाऊस किपिंगचे काम आम्हालाच द्या, वाहतुकीसाठी लागणारे वाहन आमच्याकडूनच घ्या, अशी धमकी दिली जाते. गुंडाच्या या धमकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यात येते. तसेच प्रसंगी त्यांना मारहाणही केली जाते. या दादागिरीच्या विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र पोलिसांकडून वरवरची कारवाई होत असल्याचा आरोप उद्योजकांकडून होतो.
याबाबत दै. प्रभातशी बोलताना आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, जे लोक कंपनीत काम करीत नाहीत. तसेच ज्या कंपनीत माथाडी कामगारांची आवश्यकता नाही. त्याठिकाणी वाहतूकदार किंवा कंपनीला वेठीस धरून जर पैसे उकळण्यात येत असेल तर उद्योजकांनी निर्धास्तपणे पुढे येऊन तक्रार करणे गरजेचे आहे. जर पोलिसांना अशी तक्रार मिळाल्यास त्रास देणाऱ्या कामगार संघटना व माथाडी संघटना यांचा कायमचा बंदोबस्त करू.
कामगार किंवा माथाडी संघटनाकडून अशा प्रकारे अडवणूक करणे म्हणजे हा प्रकार खंडणीचाच प्रकार आहे. अशा प्रकारचे दोन तीन गुन्हे झाल्यावर आणि त्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यावर अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलैल्या त्या संघटनेच्या दोषी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मोकाची कारवाई करणार आहोत. अशा प्रकारचे गुन्हे संघटीत गुन्हेगारीच्या प्रकारात मोडणारे आहेत. कंपनी किंवा नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे पोलिसांचे काम आहे. सर्व कंपन्याना आणि वाहतूकदारांना पत्र पाठविणार असल्याचेही आयुक्त म्हणाले. अशा प्रकारचे गुन्हे कोणी करीत असल्यास तात्काळ तक्रार दाखल करण्याचे अवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे भविष्यात कामगार संघटनांची दादागिरी मोडीत निघेल हे निश्चित मानले जात आहे.