भारतीय बॅडमिंटनमध्ये एक नवी खेळाडू दाखल झाली आहे. तिने खूप कमी वेळातच आपल्या नावाचा डंका देशभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाजवला आहे. या नवोदित खेळाडूचे नाव आहे तसनीम मिर. सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्याकडून प्रेरणा घेत तसनीमने या खेळाचे घडे गिरवायला सुरुवात केली व आज ती अशा वळणावर येऊन पोहोचली आहे की ती येत्या काळात देशाची “नवी फुलराणी’ म्हणून नावारूपाला येईल.
भारताच्या बॅडमिंटनचा उल्लेख केला, तर केवळ सायना व सिंधू यांचीच नावे डोळ्यासमोर येतात. सायनाने जेव्हा पदार्पण केले तेव्हाच तिने जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. जे सायनाने केले त्याचाच कित्ता सिंधूनेही गिरवला व एक पाऊल पुढे टाकत ऑलिम्पिकची दोन पदके मिळवली. आता याच दोघींच्या खेळातून प्रेरणा घेत तसनीमनेही आपली वाटचाल सुरू केली आहे. सायना व सिंधूने भारतीय क्रीडा रसिकांना बॅडमिंटनचे सामने पाहण्याची सवय लावली. यापूर्वी केवळ प्रकाश पदुकोन व नंतर पुलेला गोपीचंद यांचेच नाव देशभरात चर्चेत राहिले. त्यातही या दोघांनी जागतिक स्तरावरील सर्वात मानाची समजली जात असलेली ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली तेव्हा खरेतर भारतीय बॅडमिंटनला आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभार्याने घेतले जाऊ लागले.
पदुकोन, गोपीचंद, सायना व सिंधू यांच्याकडून प्रेरणा घेत आज देशात लाखो खेळाडू या खेळाकडे वळले. तसनीमही याचपैकी एक.
गुजरातच्या मेहसाणा येथील 16 वर्षांच्या तसनीम मिरने आता आपली ओळख भारताची नवी फुलराणी अशी निर्माण करण्याच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. मात्र, सायना व सिंधूपेक्षाही एक पाऊल पुढे टाकत तिने जी कामगिरी केली ती खुद्द या दोघींनाही आजवरच्या कारकिर्दीत करता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. 19 वर्षांखालील गटाच्या क्रमवारीत तसनीमने एकेरी गटात जगातील अव्वल खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. ज्युनिअर गटात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर सायना व सिंधूसह अन्य एकाही महिला खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. 19 वर्षांखालील महिला एकेरीमध्ये अशी कामगिरी करणारी तसनीम पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने 2011 साली पहिल्यांदाच ज्युनिअर गटाची क्रमवारी जाहीर करण्यास प्रारंभ केला. अर्थात त्यामुळेच सायना या क्रमवारीत पात्र ठरली नाही. सिंधूने मात्र, त्यावेळी या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले होते.
तसनीमबद्दल बोलायचे तर एक वेळ अशी आली होती की आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी तिचा खेळ बंद केला होता. परंतु त्याचवेळी तिची गुणवत्ता हेरून काही प्रायोजक कंपन्या पुढे आल्या व त्यांनी तसनीमला पाठिंबा व सहकार्य दिले व त्याच जोरावर ती या खेळात नवनवे विक्रम साकार करू शकली. भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक गोपीचंद यांनी तिचा खेळ पाहून आपल्या अकादमीत तिला प्रवेश दिला व तिथेच तिच्या गुणांना वावही मिळाला व आंतरराष्ट्रीय व्यासपीठही प्राप्त झाले. तिने तीन वर्षे गोपीचंद यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले. तिने त्यानंतर गुवाहाटी येथील अकदामी गाठली व सध्या ती तिथेच सराव करत आहे. आजवरच्या वाटचालीत तसनीमने तब्बल 22 स्पर्धा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तिने एकेरी गटात दोन वेळा आशियाई विजेती बनण्याचीही कामगिरी केली आहे.
करोनामुळे पडला खंड
जगभरात पसरलेल्या करोनाच्या संकटामुळे तसनीमच्या स्पर्धांतील सहभागावरही ब्रेक पडला. या विषाणूच्या धोक्यामुळे जगभरातील ज्युनिअर तसेच वरिष्ठ गटाच्या स्पर्धाही स्थगित झाल्या किंवा काही स्पर्धा रद्दही कराव्या लागल्या. त्यानंतर बल्गेरिया, फ्रान्स तसेच बेल्जियममध्ये झालेल्या स्पर्धा तसनीमने जिंकल्या व आपली गुणवत्ता सिद्ध केली. याच कामगिरीच्या जोरावर ती जागतिक क्रमवारीत ज्युनिअर गटाच्या एकेरीत अव्वल खेळाडू बनली. करोनाचा हा कालखंड ओसरला व तिने आता आपले संपूर्ण लक्ष वरिष्ठ गटावर केंद्रित केले आहे. इराण व युगांडा येथे झालेल्या स्पर्धांनंतर तिचे या स्तरावरच्या क्रमवारीतील स्थान वधारले असून ती आता महिला एकेरी क्रमवारीत सध्या 602 या क्रमांकावर आहे. तिचे लक्ष्य पहिल्या दोनशे खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे असून येत्या काळात होत असलेल्या राष्ट्रकुल, आशियाई तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिला या क्रमवारीत प्रगती करण्याची नामी संधी आहे. तसनीम गेल्या चार वर्षांपासून गुवाहाटी येथील आसाम बॅडमिंटन अकादमीत इंडोनेशियाचे प्रसिद्ध प्रशिक्षक एडविन इरियावान यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. तिला अकादमीत पुरुष खेळाडूंसह सराव करायला मिळत असून त्यांचे तसेच अन्य वरिष्ठ महिला गटाचे सामनेही पाहायला मिळतात व त्यानुरूप आपल्या खेळात बदलही करायला चांगले मार्गदर्शन मिळत आहे.
वडील व भावाकडून बहुमोल मदत
तसनीमने बॅडमिंटनचे धडे तिचे वडील व माजी राष्ट्रीय खेळाडू इरफान यांच्याकडेच गिरवले. ते स्वतः खेळाडू तर होतेच; पण एक प्रशिक्षक म्हणूनही प्रख्यात होते. त्यांना त्यांच्या खेळातील प्रावीण्यामुळेच क्रीडा कोट्यातून मेहसाणा पोवीस दलात एएसआय म्हणून कार्यरत होण्याची संधी मिळाली व त्यांनी ती स्वीकारली. तसनीम वयाच्या सातव्या वर्षांपासून आपल्या वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली या खेळातील बारकावे शिकली. तिचे वडीलच नव्हे तर तिचा धाकटा भाऊ महंमद अली मीर हा देखील एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे. गुवाहाटीतील अकादमीत तो देखील तसनीमसह प्रशिक्षण घेत आहे. तसनीमने वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रीय ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले. तिने 13, 15 व 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात राष्ट्रीय विजेतेपदही साकार केले. तिने 2018 साली हैदराबाद तसेच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय सब-ज्युनियर मानांकन स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात एकेरी तसेच दुहेरीचेही विजेतेपद मिळवले. याच स्पर्धेद्वारे तिचे नाव सातत्याने वृत्तपत्रांत झळकू लागले व तिच्या खेळावर गोपीचंदही प्रभावित झाले. 2019 साली रशियात झालेल्या जागतिक ज्युनिअर विजेतेपद स्पर्धेत तिने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. त्याच वर्षी इंडोनेशियात झालेल्या आशियाई स्पर्धेच्या 17 व 15 वर्षे वयोगटात तसेच 2020 साली काठमांडू येथे झालेल्या प्रेसिडेंट करंडक ज्युनिअर स्पर्देतही तिने विजेतेपदाला गवसणी घातली.
आगामी तीन वर्षे महत्त्वाची
तसनीम ही भारतीय बॅडमिंटनमधील नवोदित खेळाडू असली तरीही तिने केलेली कामगिरी येत्या काळात तिला भारताची सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून प्रस्थापित करेल, यात शंका नाही. पुढील काळात तसनीमला आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच राष्ट्रकुल, खेलो इंडिया, आशियाई व विविध देशांत होत असलेल्या मानांकन स्पर्धांमध्ये अलौकिक कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. या स्तरावर जर तिने सातत्याने चमकदार कामगिरी केली, तर तिला देशाला पदके जिंकून देण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. मिर आता केवळ 17 वर्षांची आहे, तिच्यापुढे मोठी कारकीर्द असून येत्या काळात सायना व सिंधू निवृत्ती घेतील व त्यावेळी भारताकडे जागतिक स्तरावर पदके मिळून देणारी मिरसारखी प्रतिभावान खेळाडू तयार झालेली असेल. आगामी काळात मिरला इंडोनेशिया, जपान, चीन, कोरिया, तैवान या बॅडमिंटन महासत्ता बनलेल्या देशांचे आव्हान मोडीत काढून भारताचा दबदबा प्रस्थापित करायचा आहे.
पॅरिस ऑलिम्पिक व तंदुरुस्तीचे आव्हान
सायना व सिंधूप्रमाणे तसनीमलाही ऑलिम्पिकचे पदक खुणावत आहे. तिने आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यावरही हेच सांगितले होते. टोकियो ऑलिम्पिकमधील सिंधूची कामगिरी पाहिल्यावर आपणही तिच्यासारखेच ऑलिम्पिक पदक विजेते बनायचे हा निर्धार तिने व्यक्तही केला होता. आता तिच्यासमोर येत्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे आव्हान आहे. त्यातही 2024 साली पॅरिस ऑलिम्पिक होत असल्याने त्यापूर्वीच्या पात्रता स्पर्धांमध्ये विजेतेपदांना गवसणी घालून पॅरिस ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करावा लागणार आहे. मात्र, त्यासाठी तिला सर्वात आधी मेहनत घ्यावी लागणार आहे ती म्हणजे तिच्या तंदुरुस्तीबाबत. सायना काय किंवा सिंधू काय त्यांनी जे यश मिळवले ते तंदुरुस्ती टिकवून त्यामुळे तसनीमलाही याबाबत जागरूक राहावे लागेल. या खेळात तिला जर ऑलिम्पिकचे पदक जिंकायचे असेल, तर पात्रता स्पर्धेत सहभागी झाल्यावर व पात्र ठरल्यावर तिला स्पर्धांची निवड अचूकपणे करावी लागेल. प्रत्येक स्पर्धेत खेळायलाच हवे असे नाही, तर काही स्पर्धांमधून विश्रांती घेत ताजेतवाने राहणेही महत्त्वाचे असते. पाहू या तसनीम यात किती यशस्वी होते ते. ती जर यशस्वी ठरली तर भारताला “नवी फुलराणी’ गवसलेली असेल.
अमित डोंगरे