सामाजिक सलोख्यामुळे एकोप्याला अनेकांचा हातभार, शांतता अबाधित
सातारा – संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर सातारकरांच्या धार्मिक एकोप्याला अनेकांचा हातभार लागला आहे. सर्वांच्या स्वयंपूर्ण दक्षतेने शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखली गेली आहे.
न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेत श्रीराम मंदिर व पर्यायी पाच एकर क्षेत्रात मशिद निर्माण करण्याचा निर्णय दिला आहे. हा निकाल समजताच त्याचे अनेकांनी स्वागत केले आहे. हिंदू- मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतीक म्हणून सातारचे कर सल्लागार, चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांनी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी राम-रहीम मराठी चित्रपट प्रदर्शित करून हिंदू- मुस्लिम भाईचारा अबाधित राखण्यास मदत केली होती.
अनेकांनी त्याचे स्वागत केले होते. त्याच पद्धतीने आज शांतता कायम राखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व समाजाने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेतला. ईद-इ-मिलाद व निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोशल मीडियावर सायबर सेलद्वारे करडी नजर ठेवून अफवा पसरवून धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेतली होती.
देश पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मुस्लिम समाजातील नेत्यांची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यापूर्वीच दिली होती. साताऱ्यात सामाजिक कार्यकर्ते ऍड. कॉम्रेड वसंत नलावडे, विजय मांडके, अस्लम तडसरकर यांनी भाईचारा टिकविण्यासाठी सातत्याने विधायक उपक्रम राबविले. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह मान्यवरांनी सोशल मीडियावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोस्ट व्हायरल केली.
त्यामुळे या निकालाच्या अनुषंगाने अयोध्या प्रकरण संपले असून या निकालाचा सातारकरांनी सन्मान राखल्याबद्दल मान्यवरांनी आभार मानले आहेत. साताऱ्यातील सर्व व्यवहार व वाहतूक सुरळीतपणे चालू होती. सर्व जाती धर्माच्या बांधवांनी रितीरिवाजप्रमाणे धार्मिकस्थळी जाऊन प्रार्थना करून सर्वांच्या कल्याणाची अपेक्षा व्यक्त केली. हा जय- पराजय नसून भारतीय संविधानाचा विजय आहे. त्याचा आदर राखणे सर्व भारतीयांचे पहिले कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया सातारचे सुपुत्र व दलित सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रेमानंद जगताप, बॅंक अधिकारी सुजित शेख, भाजप शहर अध्यक्ष सुनील काळेकर व मान्यवरांनी दिली.