सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जास्त तीव्रतेने जाणवू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात अद्यापही 50 ते 52 फूट पाणीसाठा असताना पाणीटंचाईचे सावट गडद होत असून पाणी गळतीच्या तांत्रिक अडचणी पाणीपुरवठ्याच्या मुळावर आल्या आहेत. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी येत नाही त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
2023- 24 या एका वर्षामध्ये सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 5000 टँकर वाऱ्या झाल्याची माहिती समोर आली आहे. 2017 ते 20 या दरम्यान सातारा शहराची हद्दवाढ जाहीर होऊन मागील चार वर्षांमध्ये पायाभूत सुविधांची जाळे उभे करण्यात आले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून गोडोली तसेच शाहूनगर विलासपुर या भागांसाठी बारा कोटीची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. कृष्णा नदीच्या उद्भवातून सहा लाख एमएलडी पाणी उचलण्याची सोय निर्माण झाली तर सातारा शहराला कास व उरमोडी या दोन्ही क्षेत्रातून पहिल्या टप्प्यात दहा लाख एम एल डी पाणी उपसा केला जातो.
मात्र सातारा शहराचा पाणीपुरवठा आणि उन्हाळ्यामध्ये पाणी असूनही गळतीमुळे घाईला आला आहे. बोगदा परिसर, खारी विहीर, बदामी विहीर, पंताचा गोट, हॉटेल मानस परिसर, सातारा नगरपालिका कार्यालय अशा विविध ठिकाणी सध्या पाण्याची प्रचंड गळती सुरू असून उपलब्ध पाण्यापैकी 20 टक्के पाणी केवळ रस्त्याने वाहून जात आहे
.
सातारा शहरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ टाक्या आहेत मात्र घंटेवारी म्हणजे पाणी सोडण्याची वेळ पाळली जात नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांना लेवल मिळत नाही परिणामी नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नाही. या घंटेवारीचे नियोजन राजकीय दबावातून बदलले जात असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत.
काही भागांना केवळ 15 ते 20 मिनिटे पाणी मिळते उदाहरणार्थ मंगळवार पेठ आणि शनिवार पेठ केसरकर पेठ सर्वोदय कॉलनी तसेच शिवम कॉलनी शुक्रवार पेठ या भागात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची बोंब आहे. सातारा पालिकेने दोन टँकर तसेच दहा हजार लिटरचे दोन नवीन टँकर आणि सहा ट्रॅक्टर असा ताफा सज्ज ठेवला आहे.
सातारा शहराच्या गावठाणासह हद्द वाढीच्या भागातही गेल्या वर्षभरात खाजगी आणि नगरपालिकेच्या अशा साडेपाच हजार टँकरची गरज पडत आहे. याला मुख्य कारण म्हणजे वितरण वाहिन्या सक्षम नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे सातारा शहराचे दुखणे संपलेले नाही.
उन्नत वितरण प्रणाली व्यवस्थेचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या प्रणालीचे दोन किलोमीटरचे काम कास तलावापासून सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होऊन सातारा शहर आणि हद्दवाडीच्या क्षेत्राला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा आहे.
एका अपार्टमेंटला दोन हजार टँकर पाणी
गेल्या दीड महिन्यामध्ये केवळ सातारा शहराच्या पश्चिम भागामध्ये सातारा पालिकेच्या टँकरच्या 218 फेऱ्या झाल्या आहेत. रामाचा गोट परिसरातील एका अपार्टमेंटला टँकरने पाणी देण्याचे नवीन रेकॉर्ड नोंद झाले आहे. या एका अपार्टमेंटला गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दोन हजार टँकर पाणी देण्यात आले आहे.