सातारा – करोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या; परंतु विधान परिषद व ग्रामपंचायतींच्या निवडणुका व्यवस्थित झाल्या. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या मागणीचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, अशा आदेश राज्य शासनाच्या सहकार खात्याने काढला आहे. सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा बॅंक, कृष्णा कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.
कोविड-19 मुळे देशात लॉकाडाऊन करण्यात आले होते. निवडणुकाही स्थगित करण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 18 मार्च 2020 रोजीच्या आदेशान्वये 17 जून 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. करोनाचे सावट कायम राहिल्याने दि. 17 जूनच्या आदेशाने 16 सप्टेंबर 2020 पर्यंत आणि त्यानंतर 28 सप्टेंबरच्या आदेशाने 31 डिसेंबर 2020 पर्यत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्यावर असतील, त्या टप्यावर 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
दरम्यान, डिसेंबरमध्ये विधान परिषदांच्या आणि नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका निर्विघ्नपणे झाल्या. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती. त्याचा विचार करून राज्य शासनाने 16 जानेवारी 2021 रोजीचा आदेश रद्द केला आहे. ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून कोविड19 च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत सहकारी संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी, असे परिपत्रक काढले आहे.