नागठाणे – सातारा व कराड असे दोन तालुके व बोरगाव व उंब्रज अशा दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असणार्या अतित, काशीळ पालीच्या शमनापीराच्या डोंगरावर असणार्या पीर दरग्यावर दर्शनासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू झाला होता. एवढ्या उंचीवरुन मृतदेह खाली आणण्याचे आव्हान सर्वांसमोर उभे राहिले होते. मात्र, त्या व्यक्तीचा मृतदेह डोंगरमाथ्यावरून जवळपास तीन हजार फुटांवरुन खाली पायथ्यास आणण्याचे काम अतित व रामकृष्णनगरच्या युवकांनी केले आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पाल (ता. कराड) येथील मुजावर कुटूंबातील सहा ते सातजण दि 4 रोजी शमनापीराच्या डोंगरावर दर्शनासाठी गेले होते. पायथ्यापासुन माथ्यापर्यंत खडा डोंगर पायी चढून हे कुटूंब 3 हजार फूट उंचीच्या डोंगरावर पोहोचले. त्यावेळी त्यातील सिराज अब्दुल मुजावर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते तिथेच खाली बसले. त्यानंतर त्यांची तब्ब्येत आणखीच बिघडली व काही वेळात त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
डोंगरमाथ्यावरच मृत्यू झाल्याने त्यांना खाली कसे न्यायचे असा पेच नातेवाईकांसमोर उभा राहिला. त्यांनी मोबाईल फोनद्वारे इतर नातेवाईकांकडे मदतीसाठी मागणी केली. परंतू सर्व शक्यता पडताळूनही मदत उपलब्ध होऊ शकली नाही. ही घटना अतित (ता. सातारा) येथील श्री रूग्णवाहिकेचे चालक समीर केंजळे यांना समजली. त्यांनी लागलीच रामकृष्णनगर येथील विवेकानंद करियर अॅकॅडमीतील प्रथमेश शिंदे, प्रणव मगर,मंगेश खंडाईत, गौरव घोरपडे, विजय चव्हाण,परवेज शेख ओमकार सकुंडे अभिषेक जाधव व सचिन कोळी या प्रशिक्षणार्थी मुलांना सोबत घेतले.
या सर्वांनी कसरत करत शमनापीर डोंगरावरून पायथ्यापर्यंत जवळपास तीन हजार फुट उंचीवरून मृतदेह व्यवस्थित खाली आणला व अडचणीत असलेल्या मुजावर कुटूंबास मदत केली. यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुधीर भोसले, कॉ. उत्तम गायकवाड हे उपस्थित होते. या मदतीबाबतची माहिती काशीळ ,अतित पाल पंचक्रोशीत कळल्यानंतर या युवकांचे कौतुक होत आहे.
चोवीस तास मदतीसाठी तत्पर समीर केंजळे
अतित ( ता. सातारा) येथील श्री. रुग्णवाहिकचे चालक व मालक असलेले समीर केंजळे हे संकटात अनेकांना उपयोगी पडतात. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर छोटे मोठे व प्राणघातक अपघात वारंवार घडत असतात. त्याच बरोबर अनेक गळफास, पाण्यात बुडून मृत्यू, जळीत घटना ही घडत असतात. अशावेळी एका फोन कॉलवर चोवीस तास मदतीसाठीही तत्पर असतात. अशा प्रसंगी एखाद्या कुटुंबाकडे पैसे नसेल तरी निरपेक्ष भावनेने मदत करतात. त्यामुळे अतित पंचक्रोशीत त्यांचा चांगला नावलौकीक आहे.