वर्षानुवर्षे तलाठ्यांनी गावातच ठाण मांडले : बदलीच्या नियमांना हरताळ, भाऊसाहेबांची मक्तेदारी
सासवड – पुरंदर तालुक्यातील तलाठी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीविषयक सर्वच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या पुरंदर तालुक्यातील महसुली विभागात दिसून येत आहे. अनेक तलाठी 15 ते 20 वर्षांपासून एकाच गावात (सजा) कार्यरत आहेत.
शासकीय नियमानुसार तलाठ्यांच्या नियमित बदल्या करणे बंधनकारक आहे. ज्या तलाठ्यांच्या तालुकाबाहेर बदली होणे अपेक्षित असताना हे तलाठी एकाच ठिकाणी कार्यरत का आहेत, याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. पुरंदर तालुक्यातील सतरा तलाठी एकाच सजा काम करीत असल्यामुळे ते महसुल विभागाचे त्या गावातील घरजावई बनले आहेत.
तालुक्यातील तलाठी एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने स्थानिक राजकीय पुढारी, जमिन खरेदी विक्री करणारे एजंट, गौण खनिज माफियांशी बहुतांश तलाठी संगनमताने गावकारभार हाकत आहेत. आर्थिक हितसंबंधांमुळे तलाठ्यांनी बेकायदेशीर नोंदी केल्याचे आढळून आले आहे. काही तलाठी तर स्वतःच इस्टेट एजंट झाले आहेत.
तलाठ्यांच्या महसुली कामकाजातील दफ्तर दिरंगाई तर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक तलाठ्यांनी सासवड शहरातच स्वतःची खासगी कार्यालये थाटली आहेत. ते आपल्या सजात हजरच राहत नाही. याउलट ग्रामीण भागातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी व सातबाऱ्यांसाठी सासवडला हेलपाटे मारावे लागत आहेत.
तलाठ्यांवर नियंत्रण, देखरेख व अंकुश ठेवण्यासाठी महसुली यंत्रणेत मंडलाधिकारी नियुक्त असतात. मात्र, पुरंदर तालुक्यातील मंडलाधिकारीच तलाठ्यांना पाठिशी घालत आहेत, असे दिसून येत आहे. कुंपणच शेत खातंय की काय, अशी अवस्था पुरंदर तालुक्यातील महसुली यंत्रणेची झाली आहे. नियमानुसार तलाठ्यांच्या बदल्यात का केल्या जात नाही, याचे कोडे अद्याप पुरंदरकरांना उलगडले नाही. तलाठ्यांच्या रखडलेल्या बदल्या व बदल्यांचे घोळ हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण
झाली आहे.
ठाण मांडलेले तलाठी अन् त्यांचा कार्यकाळ
बाळासाहेब सोपानराव ढमढेरे (6 वर्षे), संजय सर्जेराव खोमणे (9 वर्षे), बापूसाहेब नामदेव देवकर (9 वर्षे), बापूसाहेब दिनकर मोकाशी (13 वर्षे), दिगंबर कृष्णा वनवे (6वर्षे), महादेव रामचंद्र जरांडे (14 वर्षे), नंदकुमार संपतराव खरात (8 वर्षे), विश्वास माधवराव आटोळे (10 वर्षे), सोमेश्वर शंकर बनसोड े(6 वर्षे), प्रफुल्ल बाळासाहेब व्यवहारे (12वर्षे), मनीषा नारायण भोंगळे (10 वर्षे), निलेश नानाजी पाटील (10 वर्षे), सुधाकर मारूती गिरमे (10 वर्षे), प्रमोद शंकर झुरुंगे (9 वर्षे), साईनाथ दामोदर गवळी (7 वर्षे), संतोष यशवंत होले (7 वर्षे), बाबू विठ्ठल आगे (6 वर्षे).
तलाठ्यांच्या बदल्या करणे हे प्रांताधिकारी यांच्या अखत्यारित येत आहे. तहसील कार्यालयाकडून याबाबतीत काहीही कार्यवाही करता येऊ शकत नाही.
– रूपाली सरनौबत,
तहसीलदार, पुरंदर.
पुरंदर तालुक्यातील रखडलेल्या तलाठ्यांच्या बदल्या मे 2020 मध्ये करण्याचा विचार केला जात आहे. त्यानुसार शासकीय नियमानुसार त्यांच्या बदल्या करण्यात येतील.
– पी. आर. गायकवाड,
प्रांताधिकारी.