संदीप मोरे
रहिमतपूर – कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या व सर्वात जुनी नगरपालिका असणाऱ्या रहिमतपूर बस स्थानकाच्या विकासाचा प्रकल्प शासनाने गुंडाळला असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
बांधा, वापरा व हस्तांतरित करा या योजनेंतर्गत उभ्या राहणाऱ्या बस स्थानकाच्या प्रकल्पाला शासनाने गुंडाळले आहे. गेले अनेक वर्ष हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व प्रकल्प पूर्ण कधी होतोय याची वाट बघणार्या नागरिकांना हा धक्कादायक निर्णय आहे. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी महत्वाची बाजारपेठ म्हणून रहिमतपूरचा आधार आहे. या बस स्थानकातून कराड, कोरेगाव, सातारा, वडूज, औंध, पुसेसावळी, विटा या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता जातो. महाबळेश्वर ते विटा रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन रहिमतपूर बस स्थानकात जवळूनच हा रस्ता जातो. त्यामुळे या रस्त्यावर सुद्धा वर्दळ वाढली आहे. पंचक्रोशीतील जवळपास ३७ गावांसाठी ही मुख्य बाजारपेठ आहे. रहिमतपूरमध्ये असणाऱ्या चारही शिक्षण संस्थांमध्ये परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतर कामांसाठी सुद्धा नागरिकांचे मोठ्या प्रमाणात येजा असते. याठिकाणी रहिमतपूर बस स्थानकासाठी जवळपास चार एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. यामधील अर्ध्या जमिनीवर बस स्थानकाची अगदी तोकडी इमारत उभी आहे.
प्रवाशांना बसण्यासाठी जागा पुरत नाही एवढे छप्पर डोक्यावर आहे. वाहतूक नियंत्रण कक्ष नावाला आहे. त्या ठिकाणी फक्त सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेपुरतेच वाहतूक नियंत्रक उपस्थित असतात. अनेक गैरसोयींचा सामना शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना करावा लागत आहे. बस स्थानकाची जागा बघून माजी नगराध्यक्ष सुनील माने यांनी बीओटी तत्त्वावर बस स्थानकाच्या सुशोभीकरणाचा घाट घातला होता. तसे झाले असते तर भव्य दिव्य बसस्थानक नागरिकांच्या सेवेसाठी उभे राहिले असते. स्थानकाच्या आत अनेक गाळे उभे राहून त्यामध्ये व्यावसायिकांना आपली दुकाने सुरू करता आली असती.यामधून आर्थिक उलाढालीत वाढ होणार होती. स्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस सुद्धा थांबल्या असत्या तर परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठरणार होते. परंतु, या बस स्थानकाच्या विकासाचा प्रकल्प शासनाने गुंडाळला असून नागरिकांना गैरसोयींचा सामना करीत प्रवास करावा लागणार आहे.
तर… असे झाले असते
स्वच्छ रहिमतपूर सुंदर रहिमतपूरचा नारा देत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या बस स्थानकात इमारतीच्या पाठीमागे पडीक जागा असल्यामुळे या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. बस स्थानकाचा बीओटी तत्त्वावर विकास झाला असता तर सुंदर व स्वच्छ रहिमतपूर करण्याच्या प्रयत्नाला बळ मिळणार होते. सुसज्ज व देखणी इमारत रहिमतपूरच्या सौंदर्यात भर पाडणारी इमारत ठरली असती.