मायणी – मायणी परिसरात दादागिरी, भाईगिरी करणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करणारा कोणीही असो ,कोणत्याही धर्माचा असो, त्याची अजिबात गय करण्यात येणार नाही,येथील सामजिक शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला मग तो कोणीही कितीही मोठा असूद्या, त्याला जन्माची अद्दल घडेल व अशा तरुणांवर पोलिसांचा वॉच राहील, असा इशारा वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी दिला.
मायणी, ता. खटाव येथे आयोजित शांतता व सलोखा बैठकीत ते बोलत होते. मायणी येथे गत दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवण्याच्या कारणाने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने सलोखा बैठकीचे आयोजन मायणी पोलीस दूरक्षेत्र येथे करण्यात आले होते. यावेळी सहाय्यकपोलीस निरीक्षक अमोल माने, सरपंच प्रतिनिधी रणजित माने, डॉ .विकास देशमुख,पोलीस पाटील प्रशांत कोळी, गणीभाई बागवान,इब्राहिम तांबोळी, अनिल माळी, दीपक कणसे, झाकीरभाई नदाफ, विकास सकट, अंकुश निकाळजे, मन्सूर नदाफ, इकबाल नदाफ, विलास सोमदे, डॉ. तबिब, रामभाऊ सोमदे, समीर नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
महेश इंगळे म्हणाले, मागील काही महिन्यांपूर्वी पासून काही छोट्या गोष्टींचा बाऊ करून धर्मा-धर्मात अपप्रचार करण्याचे प्रकार सुरू आहेत. यात सोशल मीडियावर याचा जास्त प्रसार होतो. गावातील सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात परंतु काही ठराविक लोक आपल्या येथील सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत असतात. पुसेसावळी येथे झालेल्या घटनेनंतर आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार गावागावात शांती सलोखा रहावा यासाठी बैठका घेत आहोत. तरी सुध्दा लोक त्यातून बोध घेत नाहीत.
सोशल मीडिया सामाजिक भल्यासाठी वापरा
सोशल मीडियाचा वापर करताना विचारपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. हे दोन्ही समाजाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. याची खरी गरज युवक वर्गाला आहे. समाजातील बुजुर्ग लोकांनी युवकांच्या कार्यप्रणालीवर लक्ष देऊन या समाजघातक गोष्टींपासून त्यांना परावृत्त केले पाहिजे. गावामध्ये बाहेरील व्यक्ती येऊन गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यास गावकऱ्यांनी वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे. चांगल्या गोष्टीसाठी गावकऱ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा.या प्रश्नी उपस्थित मान्यवर व युवकांनी आपले विचार मनोगतातून मांडताना मायणी याठिकाणी अशी कोणतीही तेढ होणारी परस्थिती निर्माण होऊ नये, पूर्वीपासून असलेले आपले शांती आणि सलोख्याचे संबंध कायम स्वरुपी राहावेत, अशी अपेक्षा श्री. इंगळे यांनी व्यक्त केली.