सातारा -खासगी आणि शासकीय शाळांमधील दरी कमी व्हावी आणि ग्रामीण भागातील शाळांचे चित्र बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 300 शाळा या “मॉडेल शाळा’ म्हणून शासन विकसित करणार आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील नऊ शाळांची निवड करण्यात आली आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांत याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
शाळांसाठी चांगली इमारत, सर्व क्रीडा साहित्याची उपलब्धता, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीचे पोषक वातावरण, पुस्तकापलीकडे जाऊन शिकवण्याची पद्धती, विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा, गणित याची संकल्पना समजावून सांगणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्यनिर्मितीला वाव देणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, कृतीयुक्त शिक्षणातून ज्ञानाची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांत नेतृत्वगुण विकसित करणे, विद्यार्थ्यांना ताणविरहित शिकता येणे आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करणे हे आदर्श शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार संबंधित शाळांत मुख्याध्यापक, शिक्षकांमार्फत कार्यवाही केली जाणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना ताणमुक्त शिकता यावे, पुस्तके, दप्तरापलीकडे जाऊन शाळेत, शाळेच्या परिसरात उपलब्ध साधन- सामुग्रीसह विविध विषयांतील ज्ञान अवगत करण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस तरी दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता देण्यात येणार आहे. त्यासाठी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम संबंधित शाळांत राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ‘मॉडेल स्कूल’ करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत शाळांत सर्व भौतिक सुविधा, चांगले प्रशासकीय कामकाज आणि उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता राखण्याची कार्यवाही केली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.
या आहेत नऊ शाळा…
जिल्ह्यातील नऊ जिल्हा परिषद शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात उंब्रज (ता. कराड), कुरोली-सिद्धेश्वर (ता. खटाव), एकंबे (ता. कोरेगाव), भिलार (ता. महाबळेश्वर), पानवण (ता. माण), तारळे (ता. पाटण), तरडगाव (ता. फलटण), खानापूर (ता. वाई), वर्णे (ता. सातारा) या शाळांचा समावेश आहे.