सातारा -करोनाच्या संकटामुळे बामणोली, तापोळा येथील बोटींग आणि वासोटा किल्ल्यावरील पर्यटन गेले सात ते आठ महिने बंद आहे. बोटिंग, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर बामणोली, तापोळा परिसरातील दोन ते अडीच हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता “अनलॉक’मुळे सर्वत्र सर्व काही सुरू झाल्याने बामणोली, तापोळा येथील बोटिंग व वासोट्यावरील पर्यटन पुन्हा सुरू करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत देसाई यांनी प्रशासनाला सूचना दिल्याने बोटिंग आणि पर्यटन लवकरच पुन्हा सुरू होणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. बामणोलीचे सरपंच राजेंद्र संकपाळ, भैरवनाथ बोट क्लबचे चेअरमन धनाजी संकपाळ, सचिव नीलेश शिंदे, संचालक, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत देसाई यांना निवेदन देण्यात आले.
महाबळेश्वर येथील वेण्णा लेकमध्ये बोटिंग आणि महाबळेश्वर, पाचगणीतील पर्यटन सुरू करण्यात आल्याने बामणोली, तापोळा येथील बोटिंग व वासोट्यावरील पर्यटनही सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच्या हंगामात होणाऱ्या व्यवसायातून या लोकांना उभारी मिळेल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
त्यानंतर देसाई यांनी अप्पर जिल्हाधिकारी व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बामणोली, तापोळा, वासोटा किल्ल्यावरील येथील बोटिंग व पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या आठवड्यात बोटिंग व पर्यटन सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे हजारो व्यावसायिकांचा प्रश्न सुटणार असून त्यांनी देसाई व शिवेंद्रराजे यांचे आभार मानले.