रहिमतपूर, (प्रतिनिधी) – वळीवाच्या पावसाने रहिमतपूर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घर प्रपंचाची नासधूस झाल्याने अनेक कुटुंबे हतबल झाली आहेत. त्याबरोबर महावितरणचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत.
दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी रहिमतपूर येथील बेघर वस्ती, बोरीव येथील जिल्हा परिषद शाळा व परिसरत झालेल्या नुकसानाची पाहणी केली असून तलाठ्याना नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, आंनदा कोरे, अविनाश माने आदी उपस्थित होते.
महावितरणचे ४० ते ४५ खांब पडले असून जवळपास ६० ते ७० खांब वाकले असल्याची परिस्थिती आहे. अजून पडलेले खांब निदर्शनास येत असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण चे ३१ व इतर ४० असे एकूण ७१ कर्मचारी प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत गावठाणतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
कालच्या पावसाने अनेक घरांचे जाणवरंचे शेड उडाले असून घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणत गृहउपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून अन्न धान्य हि भिजले आहे. या झालेल्या नुकसानाने अनेक नुकसानग्रस्त हतबल झाले असून ते मदतीची अपेक्षा करत आहेत.