शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या संतप्त भावना; महाविकास अघाडीने करून दाखवल
सातारा : उत्तर प्रदेश येथील लखीमपूरा खेरी येथे भाजपाचे नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आवाज उठवल्यावर त्याचे देशात पडसाद उमटू लागले होते. दरम्यान याच घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज (दि.11) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार खटाव-माण तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कडक बंद पाळून भाजपाचा व लखीमपूरा घटनेचा निषेध व्यक्त केला.
बंद यशस्वी करण्यासाठी खटाव-माण तालुक्यातील सर्वच बाजारपेठेंची गावे बंद ठेवण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना केले होते. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील सर्वच बाजारपेठांच्या गावातील व्यापाऱ्यांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी वडूज येथील हुतात्मा स्मारकापासून निषेध फेरी काढून शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या फेरीचे तहसील कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले. यावेळी कॉंग्रेसकडून जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोक गोडसे, डॉ. विवेक देशमुख, डॉ. महेश गुरव, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जून खाडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, प्रा. बंडा गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, अक्षय थोरवे, शिवसेनेकडून तालुका प्रमुख युवराज पाटील, नगरसेवक शहाजी गोडसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.