यशवंतनगर – उत्तर कोपर्डे, ता. कराड येथील नंबर नावाच्या शिवारात सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास ऊसतोड सुरू असताना, पाच एकर क्षेत्रातील उसाला अचानक आग लागली. शेतकर्यांनी प्रसंगावधान राखून बैलगाड्या बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उत्तर कोपर्डे येथील नंबर नावाच्या शिवारात सोमवारी दुपारी ऊसतोडणी सुरू असताना,
अचानक आग लागल्याने मजूरांनी आरडाओरडा केला. त्यामुळे नजीकचे शेतकरी घटनास्थळी धावले. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने बैलगाड्या उसाच्या फडातून बाहेर काढल्या. लगतच्या क्षेत्रात आग पसरू नये, म्हणून पुढचा ऊस शेतकर्यांनी तोडल्याने आग आटोक्यात आली.
या आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या आगीत शंकर रामचंद्र चव्हाण, वत्सला निवृत्ती चव्हाण (प्रत्येकी 40 गुंठे क्षेत्र), उत्तम दादू चव्हाण (30 गुंठे), शारदा शिवाजी चव्हाण (50 गुंठे), शंकर दत्तू चव्हाण आणि दिनकर शंकर चव्हाण (प्रत्येकी 20 गुंठे क्षेत्र) यांचे नुकसान झाले.