सातारा – जिल्हा बँकेच्या विविध अर्थसाह्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण पातळीवर विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे. बँकेच्या विविध योजनांचा लाभ देणार्या सोसायट्यांमुळे शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
निनाम, ता. सातारा येथे विकासरत्न आ. अभयसिंहराजे भोसले सहकार संकुल व विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अॅड. लालासाहेब पवार, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, सुरेंद्र देशपांडे, मनोहर साळुंखे, रमेश महाडिक, उद्धव जाधव, चेअरमन शंकर जाधव, आजी-माजी संचालक, सरपंच सुभाष वायदंडे, उपसरपंच नीलेश महाडिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बँकेच्या विविध अर्थसाहाय्य योजना सोसायट्यांच्या माध्यमातून गावपातळीवर राबवल्या जातात. निनाम सोसायटीचे कामकाज उल्लेखनीय असून, त्याचा फायदा सभासदांना होत आहे. सोसायटी प्रगतिपथावर नेण्यासाठी बँकेच्या योजना सभासदांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या पाहिजेत. सभासद शेतकर्यांच्या उन्नतीबरोबर संस्थेचीही उन्नती होणार आहे. सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सभासदहिताला प्राधान्य द्यावे. माजी संचालक माधवराव जाधव यांनी आभार मानले.