रांजणगाव गणपती – येथील औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांचे दूषित पाणी शेतातील विहिरीत व कुपनलिकेमध्ये उतरल्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. त्याचबरोबर पिण्यासाठी व वापरण्यासाठी ही पाणी उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, संबंधित दोषी कंपनीवर कारवाई करुन नुकसान भरपाई देण्यात यावी. कंपनीच्या दुषीत पाण्याची योग्य विल्हेवाट लावून त्वरित प्रदुषण थांबवावे, अशी मागणी शिरुर-आंबेगाव काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे यांनी सांगितले.
याबाबत आपण औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे ढोकसांगवी गावात गट नं. २८२ मधील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे.
परिणामी भाड्याने असलेल्या खोल्यांमधील भाडेकरूंची व स्वतः व शैक्षणिक संस्थेतील विद्याथांची पिण्याच्या पाण्याची, वापरासाठीच्या पाण्याची गेल्या १५ दिवसांपासून गैरसोय झाली आहे. पिण्याचे पाण्याचा स्त्रोत असलेल्या विहिरीत दूषित पाणी आल्यामुळे शेतातील ऊस व आंब्यांची झाडे व इतर सर्व पिकांचे रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामुळे कुटूंबीय मोठ्या मानसिक संकटात सापडले आहे. तसेच विद्यार्थी, कामगार आजारी पडले आहेत. याकडे तात्काळ लक्ष देवून संबंधित दोषी कंपनीवर कारवाई करुन नुकसान भरपाई देण्यात यावी. कंपनीच्या दुषीत पाण्याची योग्य विल्हेवाट लावून त्वरित प्रदूषण थांबवावे, अशी मागणी पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.