खंडाळा – शेतातील बांधाच्या वादातून भाऊच भावाच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना खंडाळा तालुक्यातील अहिरे या गावात घडली. मोहन सुरेश धायगुडे (वय-45,रा. अहिरे) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या खून प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत खंडाळा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मोहन धायगुडे व त्याचाच चुलत भाऊ असलेला संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे यांच्यामध्ये शेतीच्या बांधावरून नेहमी वाद सुरु होता. शनिवार दि 23 रोजीही सकाळी 11 च्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपीने मोहन याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर दुपारच्या सुमारास अहिरे गावच्या पारावर पुन्हा या दोघा भावंडांमध्ये वाद झाला.
यावेळी संशयित आरोपी ज्ञानेश्वर याने मोहन यांच्या डोक्यामध्ये दगड घालत मारहाण केली. या घटनेत मोहन धायगुडे गंभीर जखमी झाल्याने मयत झाल्याचे समजून आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे हेतूने मोहनला स्वतःच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकत खंडाळा बाजूकडे पलायन केले होते. मात्र तोपर्यंत खंडाळा पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले व जखमी अवस्थेतील मोहन याला ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवले.
मात्र डॉक्टरांनी गंभीर जखमी झाल्याने मोहन याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. खंडाळा पोलीस निरीक्षक विशाल वायकर व कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल दस यांनीही घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक डिपार्टमेंट व ठसेतज्ञ यांचेही पाचारण केले. याप्रकरणी वैशाली मोहन धायगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.