सातारा – केंद्र शासन पुरस्कृत विकास सेवा सोसायट्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील संगणकीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या राज्यात सुरु असून सातारा जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सर्व संस्थांचे मार्च 2022 अखेरचे ऑडिट पूर्ण झाले आहे. त्यामुळेच या प्रकल्पात जिल्ह्यातील जवळपास 97 टक्के संस्थांचे संगणकीकरण प्रथम टप्प्यात घेण्याचे निश्चित झाले आहे. हा बहुमान एकमेव सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला व संलग्न सोसायट्याना मिळाला आहे.
या प्रकल्पाचे खंडाळा, वाई, जावळी व कराड तालुक्यांमध्ये नियुक्त क्लस्टर्समार्फत वेगाने कामकाज सुरू असून ते निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील 95000 विकास सोसायट्यांपैकी 63000 विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील 21000 विकास संस्थांपैकी 12000 विकास संस्थांचे संगणकीकरण निश्चित झाले आहे. हे कामकाज तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणकीकरण करण्यात येणाऱ्या राज्यातील 4000 संस्थांमध्ये सातारा जिल्ह्यातील 960 विकास सोसायट्यांपैकी 933 विकास संस्थांची निवड करण्यात आली आहे. 214 विकास संस्थांच्या संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था) अनिल कवडे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक प्रादेशिक कार्यालयाच्या प्र. मुख्य सरव्यवस्थापक श्रीमती रश्मी दराड, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुधाकर रघुवंत, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी या मान्यवरांचा सत्कार बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांच्यामार्फत करण्यात आला.
कृषी व ग्रामीण अर्थ व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा बॅंक सदैव जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या पाठीशी आहे. बॅंकेचे आदर्शवत कामकाज इतर सहकारी बॅंकांना मार्गदर्शक ठरत असल्याचे व बॅंकेचा देशभरात नावलौकिक असल्याचे अनिल कवडे यांनी सांगिले. श्रीमती रश्मी दराड म्हणाल्या, “”जिल्हा बॅंक आर्थिकदृष्टया सक्षम आहे. बॅंकेने शैक्षणिक कर्ज, ऍग्रो टूरिझम, महिला बचतगट, फार्मर्स क्लब, गृहकर्ज, वाहन कर्ज, शुगर फॅक्टरी आदी योजनांच्या माध्यमातून चांगले कामकाज केलेले आहे. योजनांची प्रभावीपणे अंमबजावणी होते म्हणूनच नाबार्ड कोणत्याही नवीन योजनांची सुरुवात सातारा जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून करत आहे.” मार्च 2024 पासून नवीन सोसायटी संगणकीकरण मधूनच सर्व संस्थांचे कामकाज सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.
बॅंकेच्या गेल्या सात दशकांची यशस्वी वाटचाल डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी विषद केली. यामध्ये विशेष करून बॅंकेची वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बॅंकिंगद्वारे ग्राहकाभिमुक सेवा यामुळे बॅंकेस आयएसओ 9001-2015 मिळालेले नामांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी यामुळे देशाचा नावलौकिक देशपातळीवर झालेला असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेचे कामकाज अनुषंगाने असणाऱ्या अडचणी सहकार कार्यालय व नाबार्डकडून सोडविल्या जातील, असे राजेंद्र भिलारे यांनी सांगितले.